राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने शन्मुखानंद सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले

मुंबई: राष्ट्रीय पुरस्कार विजेते गायक राहुल देशपांडे यांच्या बहुचर्चित ‘अभंगवारी’ या संगीत मैफिलीने शनिवारी मुंबईतील शन्मुखानंद सभागृह भक्ती, अध्यात्म आणि संगीताच्या अविस्मरणीय अनुभवाने भारावून टाकले. हाऊसफुल्ल सभागृहात हजारो रसिकांनी संतवाङ्मयाच्या अमृतवर्षावात स्वतःला हरवून टाकले.

राहुल देशपांडे यांच्या स्वरांनी शन्मुखानंद सभागृह जणू पंढरीच्या वारीत रूपांतरित झाले. संतांच्या अभंगांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते. प्रत्येक रचना ही केवळ सादरीकरण नव्हती, तर ती भक्तीची अनुभूती होती. हजारो भाविक आणि संगीतप्रेमींनी संतांच्या अमर वाणीचा आनंद घेत हा सोहळा अविस्मरणीय ठरवला.

या कार्यक्रमाला राहुल देशपांडे यांच्या मातोश्री वंदना देशपांडे, माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशिष शेलार, विधान परिषदेचे सदस्य श्रीकांत भारतीय, खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, उद्योगपती सदानंद सुळे तसेच ओरिएंटल अरोमॅटिक्स लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग साटोस्कर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

अकराव्या वर्षात पदार्पण केलेल्या *’अभंगवारी’*ने आज भारतातील सर्वाधिक लोकप्रिय भक्तिसंगीत मैफिलींपैकी एक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. राहुल देशपांडे यांचे प्रभावी गायन, अभंगांमागील कथांचे रसपूर्ण निवेदन, त्यांची बहीण दीप्ती माटे यांचे सुरेल सादरीकरण आणि उत्कृष्ट वादकांच्या साथीने पंढरपूर वारीचा भावविश्व रंगमंचावर जिवंत झाले.

सुमारे तीन तास चाललेल्या या कार्यक्रमादरम्यान संपूर्ण सभागृह “राम कृष्ण हरी”च्या अखंड गजराने दुमदुमून गेले. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत एकनाथ आणि इतर संतकवींच्या अभंगांनी रसिकांच्या मनात भक्ती, श्रद्धा आणि अध्यात्माचा गहिरा स्पर्श निर्माण केला. प्रत्येक सादरीकरणानंतर टाळ्यांचा कडकडाट आणि उभे राहून दिलेली दाद यामुळे कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पिंपरी-चिंचवड, इंदूर, हैदराबाद, दिल्ली, बेंगळुरू, अमरावती आणि नागपूर येथील यशस्वी प्रयोगांनंतर मुंबईतील हा कार्यक्रम *’अभंगवारी’*च्या यशस्वी प्रवासातील आणखी एक सुवर्णक्षण ठरला. भक्तिसंगीताच्या माध्यमातून विविध पिढ्यांना जोडत महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा आणि सांस्कृतिक वारशाचा गौरव करणारे राहुल देशपांडे यांचे कार्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले.

देशभरातील विविध शहरांमध्ये *’अभंगवारी’*चा प्रवास सुरू असून भक्ती, एकात्मता, करुणा आणि श्रद्धेचा संदेश प्रत्येक मैफिलीतून रसिकांपर्यंत पोहोचत आहे. संगीत हे पिढ्या, भाषा आणि सीमा ओलांडून हृदयाला स्पर्श करणारे सार्वत्रिक माध्यम असल्याची प्रचीती ‘अभंगवारी’ पुन्हा पुन्हा देत आहे.

  

राहुल देशपांडे यांच्या ‘अभंगवारी’ने शन्मुखानंद सभागृह भक्तिरसात न्हाऊन निघाले

Previous post Hollywood And Bollywood Leaders Join Forces With Anti-Hunger CEO For Historic White House Discussions On American Hunger Crisis
Next post राहुल देशपांडे की ‘अभंगवारी’ ने शन्मुखानंद हॉल को भक्तिरस से सराबोर किया